प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही.. ’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१७ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता. ‘ बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत. ६८ कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. या संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने...